ठाकरे सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली तर गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी ऊर बडवुन सरकारला सांगतायत.तेव्हा, एस टी हा गरीब रथ आहे, एसटी कर्मचाऱ्यांना धाकदपटशा दाखवु नका तर लेखी आश्वासन द्या अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाण्यात आंदोलन करीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची केळकर यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यभर निदर्शनं सुरू असतानाच आता ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही काम बंद आंदोलन सुरु केले आहे. एस टी चालक आणि वाहक यांनी खोपट येथील आगारात कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या आंदोलनास संजय केळकर यांनी पाठिंबा दर्शविला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पाठींबा असल्याचे सांगुन त्यांनी ठाकरे सरकारच्या धोरणाचे वाभाडे काढले. सर्वसामान्यांची लालपरी ही गरीब रथ आहे.सरकारने तातडीने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.तसेच धाकदपटशा न दाखवता एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने लेखी आश्वासन द्यावे. अशी मागणी संजय केळकर यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही एसटी कर्मचा-यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एसटी कर्मचा-यांनी खोपट येथील आगारामध्ये केलेल्या उपोषणात सहभागी झाले होते.