ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीस्तंभ उभारला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण रहावी आणि तरूण पिढीसमोर त्यांचा एक आदर्श रहावा यासाठी त्यांचं हे शिल्प उभारलं जात आहे. ठाण्यामध्ये सावरकरांच्या स्मृती उजळाव्यात यासाठी एखादं शिल्प साकारण्याची मागणी सावरकर प्रेमी आणि सावरकर प्रतिष्ठाननं केली होती. गडकरी रंगायतनच्या आवारात तिकिट खिडकीजवळ या स्मृतीस्तंभाचं काम सुरू झालं आहे. अंदमानच्या कारागृहातील स्वंतत्र भारताचे कृतीशील स्वप्न पाहणारे सावरकर, तेथील कारागृहातील त्यांची अवस्था, मनातील चलबिचल, असहायता आणि त्यातून निर्माण झालेले काव्य दृश्य स्वरूपात स्मृतीस्तंभाद्वारे मांडण्यात येत आहे. ६० बाय ६० फूटाच्या जागेवर सावरकरांचे संकल्पचित्र साकारत अंदमानच्या कालकोठडीचे चित्र, पुढे पाण्यात निखळून पडलेली खिडकीची चौकट आणि त्यापुढे जाऊन कोलमडून पडलेला ब्रिटीश सत्तेचा पिंजरा आणि त्यातून बाहेर पडणारे स्वातंत्र्यप्रेमी पक्षी म्हणजे स्वातंत्र्यासाठी तळमळणारे भारतीयच. अशा प्रकारची कल्पना साकारण्यात येत आहे. सुनील चौधरी हे शिल्प साकारत आहेत. येत्या महिनाभरात चित्रशिल्प पूर्ण होईलं अशी माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिली.