आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या कामात अनागोंदी झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निलेश कोळी यांनी केला आहे. शक्तीस्थळाजवळ असलेल्या मैदानाला संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रशासनानं निविदा काढल्या होत्या. यात सर्वात कमी निविदा असलेल्या बाळू आबनावे यांची निविदा मंजूर करण्यात आली. मैदानाभोवती संरक्षक भिंत बांधणं, रंगरंगोटी अशा कामाचा निविदेत समावेश होता. मात्र ठेकेदार आबनावे यांनी केवळ संरक्षण भिंत उभारून त्याची रंगरंगोटी केली. ५० लाखांचं काम केवळ २० लाखात केल्याचा आरोप निलेश कोळी यांनी केला. हे मैदान खाजगी असताना ठाणे महापालिकेनं या ठिकाणी कसे काम केले असा प्रश्नही कोळी यांनी उपस्थित केला आहे. या मैदानाचं प्रकरण न्यायालयात सुरू असताना आणि न्यायालयानं कोणतंही बांधकाम करू नये असे आदेश दिले असतानाही पालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून भिंतीचं काम केल्याचा आरोपही निलेश कोळी यांनी केला आहे.