मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झाली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून ७ ते ८ अनधिकृत दर्गे उभारल्याची माहिती ठाणे शहर मनसेने उघडकीस आणली आहे. तसेच मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे १५ दिवसात हटवा अन्यथा या ठीकाणी हनुमान मंदिर उभारू असा इशारा एका निवेदना द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली आहेत. या दर्ग्याची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसुन येत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. या अवैध बांधकामास वनविभाग, जिल्हाधिकारी, वीज वितरण, ठाणे महापालिका, पाणी विभाग यांचेकडून सर्व सोईसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का ? तसेच हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे. या जागेवर अतिक्रमण करत असलेले भूमाफिया नक्की कोण आहेत? यांना पाठीशी कोण घालत आहे? या सर्व गंभीर गोष्टींची दखल घेऊन येत्या १५ दिवसांत हे अतिक्रमण हटवण्यात यावे, अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच दर्ग्याच्या बाजुला हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरु करेल. असा इशारा यावेळी अविनाश जाधव यांनी दिला आहे.