अंतर्गत मेट्रोमुळे एकाही ठाणेकराला उध्वस्त होऊ न देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

शहरामध्ये १० हजार कोटी रूपयांच्या अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत मेट्रोमुळे अनेक लोक विस्थापित होणार आहेत. मात्र आम्ही एकाही ठाणेकराला उध्वस्त होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे. राज्य मंत्रीमंडळानं महापालिकेच्या सुमारे १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला अलिकडेच मंजुरी दिली आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अशा घोषणा करून लोकांना वेडं बनवण्याचा हा धंदा आहे. अंतर्गत मेट्रोचा मार्ग पाहिल्यास १ हजार इमारती बाधित होण्याची शक्यता आहे. या इमारती पाडण्यात आल्या तर सुमारे १० हजार कुटुंबं निर्वासित होतील. त्यांची व्यवस्था कशी करणार यावर कोणाकडेही उत्तर नाही. शहरामध्ये चांगले रस्ते नाहीत, शौचालयांची व्यवस्था नाही, पाण्याची समस्या आहे. असं असताना हजारो कोटींचे आकडे जाहीर करून अशक्यप्राय मेट्रो ठाण्यात धावणार असल्याचं गाजर दाखवण्यात आलं आहे. मात्र यामध्ये कळवा-मुंब्र्याचा उल्लेखनीय नाही. ठाणेकरांना जे हवं ते आधी द्यावं असं राष्ट्रवादीनं म्हटलं असून अंतर्गत मेट्रोमुळं ठाणेकरांना पुढील अनेक वर्ष भूर्दंड बसणार आहे. त्याची भरपाई कोण देणार असा प्रश्न राष्ट्रवादीनं उपस्थित केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading