सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा करण्यात आला. सध्याचे मध्यवर्ती कारागृह हा पूर्वी ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तो पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडवण्याकरिता बाजीराव पेशव्यांनी चिमाजीअप्पांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पांनी २७ मार्च १७३७ मध्ये स्थानिकांच्या सहकार्यानं या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ल्याला पोर्तुगीजांच्या जोखडीतून मुक्त केलं. त्यामुळं ठाणेकरांच्या दृष्टीनं २७ मार्च हा दिवस महत्वाचा ठरला. त्यावेळी झालेल्या संग्रमात लढलेल्या शूरवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. गेली ४ वर्ष हा दिवस साजरा केला जात आहे. मध्यवर्ती कारागृहात म्युरलच्या माध्यमातून ठाणे मुक्तीदिनाचा संग्राम लवकरच येथील भिंतींवर उभारला जाईल असं सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. यावेळी पांडुरंग बलकवडे आणि सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे मुक्तीदिनाचा संग्राम कसा घडला याची माहिती उपस्थितांना दिली. ठाणे मुक्ती संग्रामात जे लढले त्यांचे वंशज ए. पी. ढमदारे, एल. पी. गोळे, टी. पी. मानकर, नाईक, अंजूरकर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.