सर्वोत्तम शिक्षण पध्दती समर्पित भावनेनं काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत केल्यानं सिंघानिया विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया विद्यालय हा एक ब्रँड बनला आहे. शालेय शिक्षणात अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षणही महत्वाचं असतं त्यामुळं स्वत:चा विकास करताना समाज आणि राष्ट्राचाही विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजवला जातो. हा विचार रूजवण्याचं काम राज्य शासनाचा शिक्षण विभाग जिल्हा शाळांमधून करत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात बोलताना केलं. श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या शिक्षण विभागानं राबवलेल्या धोरणांमध्ये योग्य बदल केल्यानं शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात १७व्या क्रमांकावर असलेलं राज्य आता तिस-या क्रमांकावर आलं आहे. ते लवकरच पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमधून डिजीटल शिक्षणाची सुरूवात करण्यात आली आहे. येत्या काळात राज्यातील १०० जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.