शहर स्वच्छ ठेवणं ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती आपली स्वत:ची देखील जबाबदारी आहे असा विचार जेव्हा नागरिक करतील तेव्हाच ख-या अर्थानं ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. महापालिका प्रदूषण विभागातर्फे आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिकेच्या विकास कामात अडथळा ठरत असलेली झाडं न तोडता त्याचं पुनर्रोपण केलं जात आहे. विकासकानं एक झाड तोडल्यास त्याच्याकडून १५ झाडं लावून घेतली जात आहेत. महापालिकेनं आत्तापर्यंत ११ लाख झाडं लावली आहेत. पुढील दोन वर्षात कच-यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून कचरा समस्या सोडवणारं शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होईल असा विश्वासही पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. प्रदूषण विभागाच्या वतीनं हरित वाटिका उभारणी, प्लास्टीक-थर्माकोलला पर्यायी वस्तूंबाबत माहिती देणा-या ॲपचे तसंच कापडी पिशव्या तयार करणे, पाण्याची गुणवत्ता राखणारी यंत्रणा उभारणे, स्मार्ट वॉटर मीटर ॲप आदींचे उद्घाटन पालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. महापालिकेनं राबवलेल्या विविध प्रकल्पांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचा तसंच शास्त्रोक्त पध्दतीनं कच-याचे व्यवस्थापन करणा-या गृहनिर्माण संकुलांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हिरानंदानी इस्टेट लेक परिसरात विविध जातीच्या ३ हजार रोपांचे पालिका आयुक्तांच्या हस्ते रोपण करण्यात आले. यावेळी स्वत्व या सामाजिक संस्थेनं टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या बॅण्डमधून विविध ध्वनींचे सादरीकरण श्रीपाद भालेराव आणि त्यांच्या सहका-यांनी यावेळी केले.