ठाणे महापालिकेनं साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या कंत्राटदारांनी भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरल्याच्या पावत्या जमा केल्याशिवाय त्यांना देयकं दिली जाऊ नयेत असा नियम असतानाही त्यांना देयकं देणारे अधिकारीही भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. गोरगरिब, कामगार, रोजंदारीवरील तसंच कंत्राटी पध्दतीनं शहरातील साफसफाईचं काम करणा-या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे कंत्राटदारानं भरलेच नाहीत आणि असं असतानाही शासनाचा नियम डावलून कंत्राटदाराला देयकं देण्यात आली. हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचार असून संबंध प्रशासनच यामुळं अडचणीत येऊ शकते. त्यामुळं या प्रकाराची स्वतंत्रपणे चौकशी करून सफाई कामगारांचे पैसे खाणा-याला घरी बसवावे अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.