समूह विकास योजनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर दूर करूया. जे या योजनेसंदर्भात आक्षेप घेत आहेत त्यांनीही सकारात्मक सूचना जरूर कराव्यात असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाण्यातील अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना लागू केली असून या योजनेत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलताना शिंदे यांनी हे आवाहन केलं. प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून माणसं मरतात. यामुळं कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जिवितहानी होऊ नये म्हणून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या कुटुंबांना अद्याप हक्काचं घर मिळालेलं नाही. ते मिळावं याकरिता समूह विकास योजना राबवली जात असून गैरसमजामुळे ही योजना न झाल्यास एकमेव संधी आपल्या हातातून निघून जाईल असं शिंदे यांनी सांगितलं. आपण तुमच्यातलेच असून कधीही दगाबाजी करणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. या योजनेला आक्षेप घेणारी मंडळीही या सभेला उपस्थित होती. शिंदे यांनी त्यांच्या आक्षेपाचा उल्लेख करून काही त्रुटी असतील तर दूर करू, रहिवाशांसाठी जे काही चांगलं करता येईल ते आपण मिळून करूया, आपल्या सूचनांचे स्वागतच आहे असं जाहीरपणे सांगितले. दरम्यान ठाणे मतदाता जागरण अभियानानं समूह विकास योजनेला असलेले आक्षेप कायम असून मालकीच्या हक्काचं घर, हमीपत्र आणि त्रिपक्षी करार या आणि इतर मागण्या कायम असल्याचं अभियानाचं म्हणणं आहे. मात्र चर्चा करायला आमचीही तयारी असल्याचं अभियानाचे संजीव साने यांनी सांगितलं.