दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आनंद संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आनंद दिघे यांचे पुतणे आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आनंद दिघे प्रेमींची मोठी उपस्थिती होती. यावेळी आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित वेबसाईटचे जुन्या जाणत्या आनंद दिघे यांच्या सहका-यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आनंद दिघे यांची 26 ऑगस्ट ही पुण्यातिथी. या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मान्यवरांशी प्रश्नरुपी संवाद करत आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आनंद दिघे हे सर्वसामान्यांचे नेते होते. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे त्यांच्या कामाचे सूत्र होते. कोणतेही प्रश्न रेंगाळत न ठेवता तातडीने निकाली लावणे ही आनंद दिघे यांच्या कामाची पध्दत होती. गणेश दर्शन स्पर्धा असू द्या की रंगपंचमी धार्मिक सणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी ते जोडले गेले. अशा अनेक आठवणींद्वारे आनंद दिघे यांची कार्यशैली उपस्थितांसमोर मांडण्यात आली. आनंद दिघे हे कोणत्याही कामात झोकून देऊन काम करायचे. तत्वाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. संस्कृतीबद्दल त्यांना आदर होता. म्हणूनच नवरात्रोत्सव, दहीहंडी, श्रीगणेश स्पर्धेचे आयोजन केल्याचे संगण्यात आले.आनंद दिघे यांच्याबद्दल आदरयुक्त भीती प्रत्येकाच्या मनात होती. पण सर्वसामान्यांची आपुलकीने विचारपूस ते करायचे. दुर्गाडी आणि मलंगगड या आंदोलनाकडे त्यांनी उत्सव म्हणून बघितले मात्र आता हे आंदोलन नसून सोपस्कार राहिल्याची खंत कैलाश म्हापदी यांनी व्यक्त केली. आनंद दिघे ही व्यक्ती नव्हे तर तो एक विचार होता. हे विचार येणा-या पिढीपुढे नेण्याचा आमचा मानस आहे. या दृष्टीकोनातूनच प्रयत्न सुरु आहेत. आनंद दिघे यांच्या पश्चात आम्ही 18 वर्षांनतर वेबसाईट साकारली आहे. या वेबसाईटवर आनंद दिघे यांच्या जुन्या छायाचित्रांचा खजिना आहे. तसेच त्यांच्या सहका-यांची मनोगते आहेत. त्यांना लिहिलेली अनेक पत्रे आहेत. आज ठाणे शहरात किंवा वेशीवर आनंद दिघे यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती केदार दिघे यांनी देत स्मारक कशा स्वरुपात असेल याचे सादरीकरण केले. मॅनेजमेंट गुरु प्रा.नामदेवराव जाधव यांनी आनंद दिघे यांनी कधीही कोणतीही संपत्ती जमा केली नाही तर रयतेच्या मनावर राज्य केल्याचे सांगत लाखो शिवसैनिकांना मोठे केल्याचे सांगितले. यावेळी जन्मेजयराजे भोसले यांनीही आनंद दिघे यांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला.