मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांबरोबरच इतर प्रवाशांचेही हाल झाले. कल्याण-खडवली जवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे येणा-या-जाणा-या अशा दोन्ही मार्गांवर उपनगरीय गाड्या ४० मिनिटानं उशीरा धाव होत्या. यामुळं मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना तसंच इतर प्रवाशांना याचा फटका बसला. रेल्वे प्रशासनानं दुरूस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं. मात्र काम पूर्ण झाल्यावरही मध्य रेल्वेची वाहतूक दुपारपर्यंत पूर्वपदावर आली नव्हती. कालही डोंबिवलीला सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.