कोरोना संसर्ग रोखण्याच्या कार्यात महापालिका यंत्रणा गुंतलेली असतानाच शहरामध्ये अनधिकृत बांधकामांना उधाण आलं असून महापालिकेनं तातडीनं सर्वेक्षण करून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. मार्चच्या दुस-या आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजना करण्यात पालिका गुंतली होती. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अनधिकृत बांधकामांवर काहीच कारवाई होऊ शकली नाही. कोरोना मुक्तीसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचा फायदा भूमाफीया आणि अनधिकृत बांधकामं करणा-या व्यावसायिकांनी घेतला. त्यामुळं शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामं झाली. यासाठी या अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करावं अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे शहराची होणारी वाताहात भविष्यात परवडणारी नाही. बहुसंख्य अनधिकृत इमारतींमध्ये सामान्य माणसाची फसवणूक होते. महापालिकेच्या कारवाईमुळे तो उद्ध्वस्त होतो याकडेही नारायण पवार यांनी लक्ष वेधलं आहे.