विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर

विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. कौश्यामध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमातून बाहेर पडत असताना झालेली गर्दी बाजूला करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केलं. या महिलेनं नंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. ७२ तासात दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे लोकशाहीची हत्या झाल्याचं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यांनी राजीनामा देऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही त्यांची समजूत घालण्यासाठी आले होते. पण आव्हाड मात्र विनयभंगाच्या आरोपामुळे व्यथित झाल्याचं दिसत होतं. इतर कोणत्याही गुन्ह्यासाठी झालेलं राजकारण आपण समजू शकतो मात्र राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नाही. आता कशाला राजकारणात राहायचं अशा भावना काल आव्हाड यांनी व्यक्त केल्या होत्या. आज न्यायालयामध्ये आव्हाड यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयानं काही अटी-शर्थींवर आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिथे मी गुन्हाच केला नव्हता तिथे मला जामीनासाठी जावं लागतं हेच मोठं दु:ख असल्याच्या भावना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading