विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. महाराष्ट्र विद्यालयामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी घेण्याची आवश्यकता असताना तीन दिवसाचं अंतर कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून मतमोजणीमध्ये छेडछाड करण्याकरिताच मतदान आणि मतमोजणीमध्ये तीन दिवसाचं अंतर ठेवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. एकीकडे डिजीटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे हा प्रकार काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्राच्या आवारात मोबाईलचे जॅमर्स बसवावेत अशी भारतीय जनता पक्ष वगळता राज्यातील सर्व पक्षांची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. मतमोजणीच्या वेळी जॅमर न बसवल्यास आम्ही तिथे जॅमर बसवू असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.