यावर्षी आश्विन अमावास्येच्याच दिवशी दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा हा योग आला असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. यावर्षी कार्तिक शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी आली आहे. जी तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाच्या वेळी नसते तिला क्षय तिथी म्हणतात. यावर्षी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी आश्विन आमावास्या संपल्यानंतर याच दिवशी दिवाळी पाडवा साजरा करायचा आहे. सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी अश्विन आमावास्या संपल्यानंतर विरोधीकृत विक्रमसंवत २०७६ आणि महावीर जैन संवत २५४६ चा प्रारंभ होत आहे. यापूर्वी २००५ मध्ये कार्तिक शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी आली होती. आता यानंतर २०२९ मध्ये पुन्हा अशीच कार्तिक शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी येणार असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. यावर्षीच्या दिवाळी मुहुर्ताविषयी माहिती देताना सोमण यांनी सांगितलं की, आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी म्हणजे शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळी त्रयोदशी असल्यानं गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी साजरी करायची आहे. व्यापारी लोक श्रध्देनं शुभ मुहुर्त पाहून नवीन वर्षाच्या वह्या आणतात. यावर्षी शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत, दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपासून ते १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजून ३९ मिनिटांपासून ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत हिशोबाच्या वह्या आणाव्यात. यावर्षी २७ ऑक्टोबरला चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि त्याच दिवशी प्रदोषकाळी अश्विन अमावास्या संपल्यावर बलिप्रतिपदेचा म्हणजे दिवाळी पाडव्याचा सण साजरा करायचा आहे. त्याच दिवशी व्यापारी लोकांसाठी वही लेखनाचा शुभ मुहुर्त सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांपासून १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत, दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपासून ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत आहे असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.