भविष्यामध्ये वालधुनी आणि उल्हास नदीचे प्रदूषण होऊ नये याकरिता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेकडे या नद्यांच्या लेखा परिक्षणाचं काम द्यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शून्य प्रहर काळात उपस्थित केली. वालधुनी आणि उल्हास या दोन नद्या ५ शहरांमधून जात असून ५० लाख नागरिकांच्या पाण्याची तहान भागवत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. या नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, औद्योगिक कारखान्यांमधील सांडपाणी यामुळं नद्या प्रदूषित झाल्या आहेत. पावसाळ्यामध्ये नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्या कारणाने नदीतील पाणी आणि भूस्तर प्रदूषित होत आहे. यामुळं नदीच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोतसुध्दा दूषित होण्याचा धोका शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयानं नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. नद्यांची स्वच्छता करून त्या पुनर्जिवित करण्यासाठी येणारा खर्च स्थानिक संस्थांना परवडणारा नसल्यानं वालधुनी आणि उल्हास नदी पुनर्जिवित करण्यासाठी केंद्रानं निधी द्यावा अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. भविष्यामध्ये या नद्यांचं प्रदूषण होऊ नये म्हणून त्रयस्थ संस्थेला या कामाचं लेखा परिक्षण करण्याचं काम द्यावं अशी मागणीही संसदेत श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.