लुईसवाडी परिसरातील ठाणेकरांना लवकरच प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्याचा पुरवठा

हजुरी, लुईसवाडी परिसरातील रहिवाशांना आठवडाभरात प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीनं हजुरी, लुईसवाडी परिसरात पुरवण्यात येणा-या प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा बंद करून आता प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून मुंबई महापालिकेतर्फे आठवडाभरात नवीन जलजोडणी करून शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या ३० वर्षापासून हजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर या परिसराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीच्या माध्यमातून साडेबावीस दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळं पावसाळ्यात या परिसरात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांनीही स्वच्छ प्रक्रिया केलेले पाणी द्यावे अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या स्तरावर गेल्यावर्षापासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून ३ कोटी १६ लाख रूपये भरण्यात आले होते. मुंबई महापालिकेनं या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर मुंबई महापालिकेच्या सूचनेनुसार जलजोडणीच्या ठिकाणी आवश्यक असणारा इलेक्ट्रो मॅग्नेटिक जलमापक उभारण्याची कार्यवाहीही अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात या परिसराला प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading