तलावांचं शहर असलेल्या ठाणे शहराची ओळख समृध्द करण्यासाठी येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ठाण्यातील सर्व तलावांचं पुनरूज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी प्रकल्प आढावा बैठकीमध्ये तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पांचे अधिकारी आणि ठेकेदारांना कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर पर्यंत सर्व तलावांचे पुनरूज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश दिले. शहरातील तलावांचे पुनरूज्जीवन प्रकल्प ३ टप्प्यांमध्ये करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात कचराळी, कोलबाड, जेल, मखमली आणि सिध्देश्वर तलावाचा समावेश आहे. यातील कचराळी आणि कोलबाड तलावांच्या पुनरूज्जीवनाचं काम पूर्ण झालं आहे. तर जेल तलावाचं काम १० जून पर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरीत २ तलावांचं काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. ज्या तलावांच्या पुनरूज्जीवनाचं काम पावसाळ्यामध्ये करता येऊ शकते अशा सर्व तलावांचं काम पावसाळ्यातही सुरू ठेवावे असं सांगून स्पटेंबर नंतर हे काम युध्द पातळीवर पूर्ण करून घ्यावे आणि उर्वरित सर्व कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी यावेळी दिले.