येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जवळपास २ कोटी ७७ लाख खर्च करून तयार करण्यात येणा-या ५ नवीन बंधा-यांचा आणि पुर्न:बांधणी करण्यात येणा-या हुमायून बंधा-याच्या कामाचा भूमिपुजन सोहळा उद्या होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या अथक प्रयत्नाने हे काम मंजूर झाले असून भूमिपूजन झाल्यानंतर या कामाला पुढील १० दिवसात सुरुवात होणार आहे. बंधा-याद्वारे जे पाणी अडवले जाईल त्यातून ठाणे शहराला ३ ते ४ दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून येऊरच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी पोहोचविण्यासाठी महापालिका वितरण व्यवस्था तयार करणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून संजय राष्ट्रीय उद्यानातून वाहून येणारे पाणी तसेच येऊरला नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असलेले हे स्वच्छ पाणी सर्व खाडीला जाऊन मिळत असल्याने ते पाणी वाया जात होते. ही बाब आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षात आल्यानंतर जलसंधारण विभागाच्या आणि वनखात्याच्या अधिका-यांसह पाहणी केली असता, ब्रिटीशकालीन हुमायून बंधारा आणि येऊरच्या परिसरामध्ये पाण्याचा साठा ३६५ दिवस मुबलक प्रमाणात असल्याचे निर्दशनास आले. जर या ठिकाणी कोल्हापूरच्या धर्तीवर कोल्हापूर बंधा-याची निर्मिती केली तर तेथे ३ ते ४ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा या बंधा-याच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला मिळू शकेल. त्यामुळे येऊरसह शिवाईनगर, कोकणीपाडा, रामबाग, गावंडबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेला या पाण्याचा फायदा होणार आहे.
तसेच येऊर परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यासह वन्य प्राणी उन्हाळ्याच्या मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये जंगलातील पाण्याचा साठा संपल्यामुळे शहरातील वस्तीमध्ये पाणी पिण्यासाठी जंगलातून बाहेर पडत होते. येऊरमध्ये नविन निर्माण होणा-या बंधा-यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राण्याना ३६५ दिवस मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होणार असल्यामुळे आता या वन्य प्राण्यांना पाण्यासाठी नागरी वस्तीमध्ये अथवा रस्त्यावर यावे लागणार नाही. ठाणे महापालिका हद्दीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये येऊर परिसरातील असलेला हुमायून धबधबा आणि अन्य धबधब्यांवर जलसंधारण विभागाकडून बंधारा बांधून जमा झालेले पाणी महानगरपालिकेला मिळाल्यास आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.