येऊर येथील हुमायून धबधबा आणि चेना नदीवर बंधारा बांधण्यासाठी वनखात्याकडून परवानगी मिळाली आहे. येऊर आणि मिरा-भाइर्दर येथील चेना गावातील आदिवासी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकेवर अवलंबून रहावे लागत असल्यामुळे त्यांना आजही शुध्द पाणी मिळत नाही. ठाणे आणि मिरा-भाइर्दर या दोन्ही महापालिकांना स्वत:च्या पाण्याचा स्वतंत्र स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी स्टेम प्राधिकरण, एम.आय.डी.सी., मुंबई महापालिका यांच्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेनुसार स्थानिक आमदार प्रताप सरनाईक शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. हे बंधारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येत असल्यामुळे जलसंधारण विभागाला वन विभागाकडून परवानगी मिळणे आवश्यक होते. त्यासाठी जलसंधारण विभागाकडून बंधा-यांचं सर्वेक्षण करून वनविभागाकडे मंजूरीकरिता अहवाल पाठवण्यात आला होता. वनखात्याने जलसंधारण विभागाला बंधारे बाधण्यासाठी परवानगी दिली असून जलसंधारण विभागाकडून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून दोन महिन्यात बंधारे बांधण्याच्या कामाला सुरूवात होईल असे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या या बंधार्यांचा प्रश्न मार्गी लागत असून वन्य प्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यासारखे प्राणी नागरी वस्तीत येतात, त्यामुळे नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण होत असतो किंवा अनेक वेळा हे बिबटे पाण्याच्या शोधासाठी रस्त्यावर आल्यामुळे भरधाव वाहनांच्या धडकेमुळे त्यांचा मृत्यु होतो. तसेच पावसाळ्यामध्ये चेना नदीतील पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यामुळे भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या बंधार्याच्या निर्मितीनंतर ठाणे महापालिकेला किमान ४ दशलक्ष लिटर पाणी आणि मिरा-भाइर्दर महापालिकेला किमान ३ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे ठाणे आणि मिरा-भाइर्दर या दोन्ही महापालिकांना पाण्याचा स्वतंत्र स्त्रोत निर्माण झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.