ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार सायंकाळी 5.30वाजेपर्यंत जिल्ह्यात साधारणपणे 80.31 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
ठाणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील एकूण 42 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घोषित झाल्या होत्या. त्यामध्ये 42 थेट सरपंच पदासाठी तर 360 सदस्य पदांच्या जागा होत्या. नामनिर्देशनपत्रे माघारीनंतर चारही तालुक्यातील मिळून 35 ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी तर सरपंचपदाच्या 34 जागांसाठी आज मतदान झाले. त्यामध्ये थेट सरपंच पदासाठी 114 उमेदवार तर सदस्य पदांच्या 219 जागांसाठी 613 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 137 मतदान केंद्रांवर आज मतदान झाले. मतमोजणी दि. 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आज झालेल्या निवडणुकीत एकूण 30 हजार 412 स्त्री व 36 हजार 084 पुरुष तर इतर 11 मतदार असे एकूण 66 हजार 507 मतदार होते. त्यापैकी 53 हजार 414 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 24 हजार 804 महिला व 28 हजार 605 पुरुष आणि 5 इतर मतदारांचा समावेश आहे.
आज सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत झालेली तालुकानिहाय आकडेवारी कल्याण 86.61 टक्के, शहापूर 76.81 टक्के, मुरबाड 82.50 टक्के, भिवंडीत 78.92 टक्के मतदान झाले आहे.