येऊर येथील इको फ्रेन्डली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा पर्यटन खात्याचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर करण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या केंद्राला येणारा खर्च ठाणे महापालिका करणार आहे. या पर्यटन केंद्रामध्ये आदिवासींची शिल्पं, कलाकुसर, त्यांची हत्यारं, वेशभुषा, हस्तकला प्रदर्शित केली जाणार आहे. या पर्यटन केंद्रामुळे येऊर येथील आदिवासींना रोजगार उपलब्ध होणार असून या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ठाणे महापालिकेलाही महसुल मिळणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या पर्यटन केंद्रासाठी बरीच वर्ष पाठपुरावा केला होता. वनखात्याची मंजुरी मिळाल्यानंतर दोन महिन्यात या प्रकल्पाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.