आमदार जितेंद्र आव्हाड या संकल्पनेतून मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्रशिल्पाचं अनावरण खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. जगद्गुरू तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राने सजलेला महाराष्ट्र या चित्रशिल्पामध्ये दर्शवण्यात आला आहे. चित्रशिल्पकार केदार घाटे यांनी हे चित्रशिल्प साकारलं आहे. कळवा-मुंब्रा वासियांसाठी रेतीबंदर येथे चौपाटी तयार करण्यात आली आहे. कधी काळी दलदल आणि अनधिकृत बांधकामांनी वेढलेल्या रेतीबंदरचा सुनियोजित पध्दतीनं विकास केला जात आहे. या परिसरात साडेतीन किलोमीटरची चौपाटी निर्माण करण्यात येत असून या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखवणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प साकारण्यात आले आहे. महाराष्ट्राचा विकास ज्या विचारांवर झाला किंवा अधिकची प्रगती ज्या विचारांवर होईल ते विचार या चित्रशिल्पातून आव्हाड यांनी महाराष्ट्राला दाखवले असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं. या चित्रशिल्पातून महाराष्ट्राची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.