महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. अविनाश जाधव यांना 31 जुलै रोजी ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. तर कोवीड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रुग्णालयात धावुन गेलेल्या जाधव यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून कापुरबावडी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर जामीनअर्जावर सुनावणी झाल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी या गुन्ह्याबाबत जामीन अर्जावर निर्णय देणे,आपल्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट करीत जामीन अर्ज फेटाळला होता.
दरम्यान अतिवृष्टीमुळे पोलीसांना अहवाल सादर करता आला नाही त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज सत्र न्यायाधिश पी पी जाधव यांच्या न्यायालयासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी जाधव यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांना जामीनावर सोडल्यास ते पुन्हा असेच गुन्हे करतील असं न्यायालयासमोर मांडून आणखी वेळ मागण्यात आला. तर जाधव यांच्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असल्याचं जाधव यांच्यातर्फे न्यायालयात मांडण्यात आलं. न्यायालयानं या अर्जावर सुनावणी घेत काही काळ निकाल राखून ठेवला होता. मात्र दुपारी २ वाजता अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला. अविनाश जाधव यांच्यातर्फे ओंकार राजूरकर यांनी तर पोलीसांतर्फे मुख्य सरकारी वकील ए पी लोंढे यांनी काम पाहिलं. आता योग्य ती कागदपत्रं कारागृहात सादर केल्यानंतर प्रत्यक्षात अविनाश जाधव हे कारागृहाबाहेर येऊ शकतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading