राज्यभरातील रिक्षा चालक रविवार पासून म्हणजे क्रांतीदिनापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबियांची वाताहात झाली आहे. त्यामुळं रिक्षा चालकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण केलं जाणार आहे. राज्यातील सुमारे २० लाखाहून अधिक ऑटो रिक्षा चालक-मालक गेल्या चार महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळं मेटाकुटीस आले आहेत. या परिस्थितीत ऑटो रिक्षा चालकांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आली. पण शासनानं त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. आत्तापर्यंत ८ ऑटो रिक्षा चालक-मालकांनी आत्महत्या केली आहे. कित्येक ऑटो रिक्षा चालक नैराश्यामध्ये जीवन जगत आहेत. यासाठी प्रत्येक रिक्षा चालकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्यासाठी किमान ५ हजार रूपये आर्थिक मदत मिळावी, आत्महत्याग्रस्त रिक्षा चालकाच्या प्रत्येक कुटुंबियांना १० लाखांची मदत मिळावी, ऑटो रिक्षा चालकांना शेतक-यांप्रमाणे कर्जमाफी मिळावी, ऑटो रिक्षा चालकांना कोविड योध्दा म्हणून घोषित करून त्यांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे, घोषित केलेल्या कल्याणकारी मंडळाची तातडीनं अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक आमरण उपोषण करणार आहेत.