शौचालय नको की सुशोभिकरण नको महापालिकेला आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात टाकणारे जाहिरात करार सरसकट रद्द करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. पर्यावरणाच्या नावाखाली सायकल प्रकल्प सुरू करण्यात आला. मोक्याच्या जाग्या सायकल स्टँडसाठी बहाल करण्यात आल्या. त्यानंतर महामार्गावर शौचालय उभारण्याचे फॅड काढून जाहिरातीचे हक्क दिले गेले. स्वच्छ भारत योजनेच्या नावाखाली ५० चौक आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी गोंडस प्रस्तावाखाली कंत्राटदारांची बेगमी करण्यात आली. या सर्व प्रकल्पातून महापालिकेची मोठी फसवणूक झाली आहे. १७ लाख ५० हजारांच्या सायकलींच्या बदल्यात १ कोटी ८२ लाखांचा कर आणि कोट्यावधी रूपयांच्या जागेच्या भाड्यावर पाणी सोडण्यात आले. असा व्यवहार स्वत:च्या मालकीच्या जागा भाड्यानं देताना महापालिकेचे अधिकारी करतील का असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला आहे. १५ मोबाईल व्हॅन उभ्या करण्याच्या बदल्यात प्रति चौरस फूट ८९ पैसे म्हणजे कच-याच्या भावात जाहिरात कंपनीची तुमडी भरली गेली तर ७५ हजार रूपये चौरस फूट जाहिरातीचे हक्क देणा-या रौनक ॲडव्हर्टायझिंगकडून महापालिकेला वार्षिक २५ लाख रूपये दिले जातात याकडे पवार यांनी लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर वेळ मारून नेली जाते. पण त्याऐवजी वादग्रस्त करार रद्द करण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान नारायण पवार यांनी दिलं आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर ठाणेकरांची लूट करू नये अशी अपेक्षा नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे.