ठाणे महापालिकेमार्फत सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमांच्या नविन शाळा सुरु करणे नियोजित आहे.यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातही महापालिकेने कोट्यवधीची तरतुद केली आहे. ठाण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यासाठी महापलिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे हे पाऊल स्तुत्य असले तरी ‘मराठी’ शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये.अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. इंग्रजीचा सोस असला तरी मराठी शाळांच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत. असेही अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या ४ हजार ३७० कोटींच्या अर्थसंकल्पात शिक्षणाला झुकते माप दिले असुन महापलिकेमार्फत सीबीएसई शाळा सुरू करण्याचे तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या पालिकेच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत ठाण्यात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या ७ शाळा आहेत. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असला तरी सर्वसामान्य कुटुंबांना हे शिक्षण आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड असलेल्या सीबीएसई बोर्डामधून शिक्षण घेण्यासाठी ठाण्यात प्रामुख्याने केवळ खाजगी शाळांचे महागडे पर्याय उपलब्ध आहेत.तेव्हा इंग्रजी माध्यमाबाबत महापालिकेचे हे पाऊल स्तुत्य असले तरी ‘मराठी’ भाषा आणि मराठी शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये. इंग्रजी शाळा सुरु करत असताना मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. सध्या ठाण्यात मराठी शाळा बंद होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील महापालिकेच्या मराठी शाळांमधील विदयार्थ्यांची पटसंख्या वाढविणेसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहेअशी सुचना अविनाश जाधव यांनी आयुक्तांना भेटुन केली आहे. मराठी ही आपली अस्मिता असून कुठेही मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यापासून अग्रेसर आहे. त्यामुळें मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत यासाठी मनसे नेहमीच एक पाऊल पुढे टाकत आहे. ठाण्यात महापालिकेच्या शाळा आहेत. मात्र काही शाळेची अवस्था दयनीय झाली असून बदलते ठाणे अभियान अंतर्गत मराठी शाळांची डागडुजी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात यावी. विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे वर्ग बनवण्यात यावे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना योग्य सुविधासह शौचालयाकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली.