सर्वसामान्य नागरिक नागरी सुविधांपासून वंचित असून आमदार संजय केळकर यांच्या पाहणी दौऱ्यात या रहिवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आमदार संजय केळकर यांनी प्रभाग क्रमांक १ मधील साईनगर रहिवाशांच्या विनंतीनंतर या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी शौचालय आणि नाल्याची दुरवस्था उघडकीस आली. या भागासाठी महिला आणि पुरुषांसाठी १६ सीटचे शौचालय असून ते नियमित स्वच्छतेअभावी वापरास अयोग्य झाले आहे. दरवाजे तुटले आहेत, पाणी नाही, दुर्गंधी अशा समस्यांनी नागरिकांची विशेषतः महिलांची अधिक कुचंबणा होत असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष राम ठाकूर यांनी दिली. नाल्यावर पूलाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र आजतागायत कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात परिसरात पाणी शिरले. घाण पाणी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला. याबाबत केळकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला. येथील दुरवस्था पाहून ठाणे महापालिका अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो. ठेकेदार आणि प्रशासन यांच्या युतीमुळे आणि टक्केवारीमुळे नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी नरक यातना भोगाव्या लागत आहेत. या प्रकरणी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन या समस्या सोडवाव्यात अन्यथा लवकरच रहिवाशांचा मोर्चा मुख्यालयावर आणू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.