ऐतिहासिक जोगिला तलावाच्या पुनरूज्जीवनाचं काम युध्दपातळीवर सुरू असून तलावाच्या गॅबियन भिंतीचं बांधकाम तात्काळ पूर्ण करून येत्या पावसाळ्यात पाणी साठवलं जाईल असा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्तांनी जोगिला तलावाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. जोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील साडेतीनशे कुटुंबांचं पुनर्वसन करून बीएसयुपी योजनेअंतर्गत त्यांना घरं देण्यात आली आहेत. त्याबरोबरच तलावाच्या मागील बाजूस प्रस्तावित डीपी रस्त्यामधील आणि तलावालगत असलेल्या वस्त्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करून त्यांचं पुनर्वसन त्याच जागी कसे करता येईल याचे नियोजन करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी यावेळी दिले. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी या तलावाच्या गॅबियन भिंतीचं बांधकाम पूर्ण करून पावसाळ्यानंतर तलावाच्या सुशोभिकरणाचं काम पूर्ण केलं जाणार आहे. जोगिला तलावातील अस्तित्वात असलेले सर्व नैसर्गिक स्रोत पुनर्जिवीत झाले असून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरू आहे. या प्रवाहातून येणारे पाणी स्वच्छ असून महापालिका आयुक्तांनी स्वत: पाण्याचं निरिक्षण केलं. नैसर्गिक तलाव संरक्षित करून अशा पध्दतीनं पुनर्जिवित करण्यात येणारे देशातील हे पहिलेच उदाहरण असावे.