आमचा प्रेमविवाह झालाय आणि आमची भेट ग्रंथालयातच झाली अशी आठवण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल ठाण्यात चांदणं संमेलनात बोलताना सांगितली. मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे चांदणं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाची सुरूवात मंचावर चांदण्या उजळून करण्यात आली. त्यानंतर नुपूर नृत्यालयाच्या कलाकारांनी नांदी सादर केली. वाचनाचा आणि पुस्तकांचा काय परिणाम तुमच्यावर झाला या प्रश्नाचं उत्तर देताना जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी अनेक किस्से सांगितले. झाडाझडती पुस्तक वाचल्यामुळे शेतक-यांवरील कठोर कारवाई थांबवली अशी आठवण जिल्हाधिका-यांनी सांगितली तर मुलांमध्ये वाचनाची आणि साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी पालकांनीच प्रयत्न केला पाहिजे असं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं. साहित्य आणि वाचनामुळेच आपण घडलो असं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. ठाण्यातील नवोदित वादकांच्या वादनाचा कार्यक्रमही यावेळी सादर झाला. सतार, व्हायोलीन, बासरी, हार्मोनियम वादन यावेळी झालं. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या चांदण्यात रसिक न्हाऊन निघाले.