पावसाच्या पाण्यामुळे स्थलांतरीत केलेल्या कुटुंबियांना महापालिकेतर्फे मानवतेच्या दृष्टीकोनातून अन्नधान्याची पाकिटं देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून विस्थापितांना तातडीनं ही मदत दिली जाणार आहे. शहरातील साफसफाई, वैद्यकीय सुविधा, रस्ते दुरूस्ती आदी कामं युध्दपातळीवर करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरात पाणी शिरले होते त्या सर्व नागरिकांना तातडीनं वैद्यकीय सुविधा देण्यासाठी त्या त्या परिसरामध्ये आरोग्य शिबीराचं आयोजन करणं, पाण्याचा निचरा झाल्यानंतर चिखल, कचरा तात्काळ उचलणं तसंच सर्व ठिकाणी फवारणी आदी कामं युध्द पातळीवर करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. पाणी साचल्यामुळं स्थलांतरीत झालेल्या कुटुंबियांना ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, १ किलो साखर, २ किलो बटाटे, १ लिटर खाद्यतेल आणि १ ब्लँकेट पुरवण्यात येणार आहे. दिव्यातील साडेआठ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. उथळसर येथील झोपडपट्टी, कोलशेत आणि कळवा येथील काही रहिवाशांचंही स्थलांतर करण्यात आलं होतं. अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या या रहिवाशांना मानवतेच्या दृष्टीकोनातून हात देण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.