ठाणे महापालिकेनं हाती घेतलेल्या पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट झाला असून यापुढेही महापालिका वाघोबानगर आणि भास्करनगर परिसराचा विकास करण्यास कटिबध्द असेल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत अभियान मोहिमेअंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा ही मोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत श्रमदान आणि अत्याधुनिक रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने पारसिक बोगद्याजवळील स्वच्छ करण्यात आलेल्या परिसराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. गेल्या २० ते २५ वर्षापासून वाघोबानगर आणि भास्करनगरच्या मध्ये असणा-या पारसिक बोगद्यावर दोन्ही बाजूंनी कच-याचे साम्राज्य बनले होते. महापालिकेनं अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्यानं हा सर्व कचरा स्वच्छ केला. पालकमंत्र्यांच्या हस्ते याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. पारसिक बोगदा परिसरात वृक्षारोपण केलेली झाडं विद्यार्थ्यांनी दत्तक घेऊन पुढील वर्षी या वृक्षाचा वाढदिवस साजरा करावा अशी साद पालकमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना घातली. त्याला विद्यार्थ्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला. साहिल मोशन आर्टच्या माध्यमातून मंगेश देसाई यांनी स्वच्छता विषयी निर्माण केलेल्या गाण्याच्या सीडीचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसंच पारसिक बोगदा परिसरात रंगरंगोटी करून परिसर सुशोभित करणा-या आशुतोष कानडे आणि आनंद पाटील यांचा विशेष सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कळवा हिंदी विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता पर पारसिक टनेल ही विनोदी लघुनाटिक यावेळी सादर केली. या लोकार्पण सोहळ्यास विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते.