कल्याणमधील शीळ पत्रीपूलावरील तुळया बसवण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार असल्यामुळं कल्याण ते डोंबिवली दरम्यानच्या प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका बैठकीत या पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी तुळया टाकल्यावर हे काम डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास जाणार असून त्यानंतर तात्काळ हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. मुंबई ते डोंबिवली तसंच कल्याण ते कर्जत, कसारा या मार्गावर रेल्वे सेवा सुरूच राहणार आहे. या कामादरम्यान अडीचशे उपनगरीय सेवा रद्द कराव्या लागणार असल्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी वाहतुकीचे या आढावा बैठकीत नियोजन करण्यात आले. २१ आणि २२ या दोन दिवशी सकाळी १० ते २ या वेळात मेगाब्लॉक घेतला जाणार असून नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे.