दिघ्यातील धरणाच्या हस्तातरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मनसेचे सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कळवा आणि ऐरोली शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या दिघा येथील रेल्वेच्या धरणाकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा वापरच केला जात नाही. हे रेल्वेचे धरण महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी याआधी करण्यात आली होती परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झाला नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर शहारत दुष्काळ पडण्याआधी लाल फितीत अडकलेल्या या धरणाच्या वापरास सुरूवात करावी अशी मागणी मनसेचे सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत सुरु नाही. तसेच काही भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या भागात पाण्याचे नियोजन बारगळले आहे असे असताना नवी मुंबई सारख्या शहरात या धरणाचा फायदा मात्र होताना दिसत नाही. या धरणाकडे पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणून पाहिले जात आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना राबवण्यात न आल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या धरणाबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्याची मागणी सावर्डेकर यांनी केली आहे. देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर भरपूर पाणी मिळावे यासाठी ब्रिटिशांनी दिघा इलठाणपाडा येथे धरण बांधले. नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे या धरणातील पाणी मे महिन्यातही आटत नाही. पण स्वातंत्र्यानंतर या धरणातील जलसाठ्याचा काहीच उपयोग करण्यात आलेला नाही. धरणांमधील पाणीवाटप आणि वापरावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असतात. पण पाण्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर या धरणा संदर्भात योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी प्रदीप सावर्डेकर यांनी केली आहे.