असह्य उकाड्यातही ठाणेकरांना यंदा आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने २ ते १४ मे या कालावधीत गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे १६ वे वर्ष आहे. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा हा आंबा महोत्सव गावदेवी मैदानात होत आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातुन कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत असते. यात शेतक-यांना फायदा होतोच शिवाय, ग्राहकांनाही कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो.
यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी,कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो.यंदा अवकाळी पाऊस,ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे.२०२० ला ३ लाख २१ हजार मेट्रिक टन, २०२१ ला २ लाख ५६ हजार मेट्रीक टन , २०२२ ला १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे. यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे. तेव्हा शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी अशाप्रकारचे आंबा महोत्सव आयोजीत केला असुन महोत्सवात एकुण ४० स्टॉल्स असणार आहेत,पैकीपाच स्टॉल महिला बचत गटाकरीता असतील. असे केळकर यांनी सांगितले. या आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे केळकर यानी सांगितले. यासाठी राजेंद्र तावडे यांच्याशी ९८६९०१६०९२ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन संजय केळकर यांनी केले आहे.