रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सक्त सूचना

ठाणे शहरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर आणि ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावीत. ‘खड्डेमुक्त ठाणे’ साकारण्यासाठी दर्जेदार कामे होतील यावर कटाक्ष ठेवावा, अशा सक्त सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बांधकाम विभागास दिल्या. महापालिका आयुक्त विविध विभागांच्या मान्सूनपूर्व कामाचा आढावा सध्या घेत आहेत. शहरात राज्य सरकारकडून आलेल्या निधीतून ६०५ कोटी रुपयांची २८२ रस्त्यांवर कामे सुरू आहेत. त्याशिवाय महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्ते कामे, इतर विभागांच्या रस्त्यांची स्थिती याबद्दल आयुक्तांनी दिल्या. रस्त्यांची कामे करताना नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे नेटके नियोजन करून कामे लवकर पूर्ण करावीत. रस्त्यांची कामे रेंगाळतात, गुणवत्ता राखली जात नाही अशावेळी नागरिकांची असुविधा होते. त्यामुळे हाती घेतलेली कामे विनाविलंब आणि गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजेत यावर कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेवावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले. खड्डेमुक्त ठाण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. त्यामुळे शहरात एकाचवेळी अनेक ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो आहे. ही कामे अतितत्काळ पद्धतीने पूर्ण व्हावीत, कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यात ही कामे प्रलंबित राहणार नाहीत यावर महापालिकेचा कटाक्ष आहे. रस्ते कामासाठी खोदकाम केल्यावर तो रस्ता वाहतुकीस खुला करेपर्यंतचा कालावधी कमीत कमी कसा ठेवता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी सांगितले. एखादे जरी काम रखडले तर त्याचा पावसाळ्यापूर्वीच आढावा घेतला जाईल. तसेच, रस्त्यावर खड्डे पडल्यास कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला. कामाची गती, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड नको. अडचणीचा सामना करण्याचा अनुभव तुम्हाला अधिक आहे, कार्यकारी अभियंता हतबल झाला तर काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता मावळते, असेही आयुक्तांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी अनेक वर्षे महापालिकेत काम केले आहे. या यंत्रणेची तुम्हाला जाण आहे. आपल्या अनुभवाचा फायदा नागरिकांच्या कल्याणासाठी कसा करता येईल, यावर लक्ष द्यावे. जर अभियंत्यांनी सगळी कामे ठरलेल्या वेळेत, अत्युच्च दर्जा राखून पूर्ण केली, त्यात पारदर्शकता ठेवली तर नागरिकांना सुखद अनुभव मिळेल. तसेच लोकप्रतिनिधींचेही सहकार्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. देयके देण्यात विलंब खपवून घेतला जाणार नाही. ठेकेदारांची बिले देयक सादर झाल्यापासून सात दिवसांच्या आत देयक अदा झाले पाहिजे. रस्त्यांची कामे सुरू असतानाच प्रभागातील खड्डे पडण्याची हमखास ठिकाणे, संभाव्य ठिकाणे यांचा प्रभागनिहाय नकाशा तयार करून त्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. प्रभागातील प्रत्येक कामाची इत्यंभूत माहिती ठेवा. त्याचा पावसाळ्यापूर्वी पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. शहरातील सुशोभीकरणाची बहुतांश कामे पूर्ण होत आली आहेत. कापूरबावडी आणि नितीन कंपनी जंक्शन येथील उद्यानांची कामे, आनंदनगर नाका येथील दीपस्तंभ, चौकांतील शिल्पकृती यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुलांवरील शोभिवंत मोटीफ, लाईटच्या पट्ट्या यांच्या बद्दल आयुक्तांनी विद्युत विभागास सूचना दिल्या. तसेच गोखले रोड आणि राम मारुती रोड येथील रोषणाई बद्दलही काही दुरुस्तीही सांगितल्या. नालेसफाईच्या कामांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. सफाईपूर्वी आणि सफाईनंतर नाल्यांच्या स्थितीचा अभ्यास करून कंत्राटदारांची देयके दिली जाणार आहेत. या कामांवर घनकचरा विभागाच्या सोबतच आपणही बारकाईने लक्ष ठेवा असे कार्यकारी अभियंत्यांना सांगितले. पावसाळी गटारांची सफाई करताना त्यांची व्यवस्थित सफाई झाली याची स्वत: पाहणी करा. सफाईच्या या कामात हयगय झाली, बनावट कामे दाखवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. पाणी साठण्याच्या जागा हेरून त्या भागात अधिक दक्षतेने गटारांची सफाई केली जावी. पाणी साठल्याने होणाऱ्या दुर्घटना, मालमत्तांचेनुकसान टाळता येते. त्याची काळजी सगळ्यांनीच घ्यावी असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading