महापालिकेने येत्या १० दिवसात पाण्याचं नियोजन न केल्यास स्वत: रस्त्यावर उतरून महापालिकेवर लाँग मार्च काढण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. घोडबंदरला पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत आहे. घोडबंदर रोडवर तर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील जवळ जवळ 30 गृहसंकुलातील रहिवासियांनी केळकर यांची भेट घेतली. महापालिकेने नविन इमारतीना परवानगी देणे बंद केले पाहीजे तेव्हा येत्या दहा दिवसात पाण्याचे नियोजन न केल्यास स्वतः रस्त्यावर उतरून ठाणे महापालिकेवर लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा केळकर यांनी दिला. पाणी टंचाईच्या प्रश्नावर गेल्या सहा महिन्यात केळकर यांनी अनेक मोर्चे-आंदोलने केली. तसेच विधीमंडळातही आवाज उठवला. परंतु परिस्थितीत फरक पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर घोडबंदर भागातील पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या रहिवाश्यांनी काल संजय केळकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. केळकर यांनी रहिवाश्यासमवेत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडली. घोडबंदर रोडवरील गृहसंकुलांसाठी ५० एमएलडी पाणी केवळ कागदोपत्री मंजुर आहे. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीच न झाल्याने टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. घोडबंदरच्या सुमारे ३० इमारती टँकरसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजत आहेत. पाण्याची इतकी टंचाई असताना महापालिका मात्र नवनवीन बांधकामांना परवानग्या देत असल्याने उच्च न्यायालयात याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने पुरेसे पाणी पुरवता येत नसेल तर नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असे आदेश दिले होते. त्यावर ठाणे महापालिकेने पुरेसा पाणी पुरवठा करू असे प्रतिज्ञापत्र सादर केले. तरीही शहरातील अनेक भागात आजही पाणी टंचाई असून पालिका बहुमजली इमारतींना परवानगी देत आहे. शहरात ५० मजल्यांच्या १५ इमारती आणि एक ७२ मजली इमारतीला परवानगी दिली आहे. आधीच पाणी टंचाई असताना या इमारतींमधील हजारो नागरीकांना पाणी कसे पुरवणार असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित करून ही नवीन बांधकामे तात्काळ बंद करण्याची मागणी केली. धरणाला पुढची १० वर्षे लागतील तेव्हा धरण धरण करीत बसण्यापेक्षा छोटे बंधारे उभारून कल्पकतेने नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच येत्या १० दिवसाच्या आत हा परिसर टॅकरमुक्त करावा अन्यथा रस्त्यावर उतरून हिरानंदानी इस्टेट ते मुख्यालय असा लाँग मार्च काढण्याचा इशारा संजय केळकर यांनी दिला आहे. शहरात नालेसफाईत हातसफाई केली जाते, अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेकेदार मंडळी केवळ फार्स करून बिले उकळतात. यावर अंकुश बसावा यासाठी नालेसफाईसाठी जी एकत्रित रक्कम असेल ती विभागुन पावसाळ्याआधी नालेसफाई करण्याबरोबरच पुन्हा चार-पाच महिन्यांनी दुबार नालेसफाई केली पाहीजे. अशी सूचना केली असुन ती आयुक्तांनी मान्य केली आहे. तसेच, योग्य पद्धतीने नालेसफाई करावी यासाठी एका विकासकाने पुढाकार घेतला असुन त्याचे मॉडेल लवकरच पालिकेला सादर केले जाणार आहे. याच धर्तीवर नाले दत्तक घ्यावेत असे सांगुन आमच्या संस्थेमार्फत एक नाला दत्तक घेतला असल्याचंही केळकर यांनी स्पष्ट केले.