शिधावाटप दुकानातून नागरिकांना मिळणा-या शिध्याचे प्रमाण वाढविण्याची मागणी माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. द्रारिद्र्य रेषखालील नागरिकांना शासनातर्फे उपजिविकेसाठी गहू, तांदुळ शिधा देण्यात येतो. परंतू एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मिळणारा गहु, तांदुळाचा कोटा कमी करण्यात आला असून आता फक्त प्रत्येकी १० किलो गहू देण्यात येत आहे. तसेच शहरी भागातील नागरिकांना पहिले प्रत्येकी ३ किलो गहू महिनाभरासाठी मिळत होते तर आता फक्त प्रत्येकी १ किलो गहू देण्यात येत आहे. शहरी आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मजूर, कामगार राहत असून ते मेहनतीचे काम करत असतात. शारिरीक ताकदीच्या दृष्टीने त्यांच्या आहारात चपाती, भाकरीचे प्रमाण जास्त असते. शासनातर्फे देण्यात येणा-या शिध्यातूनच या कष्टकरी मजदूरांचे पोट भरते. परंतु १ किलो गहू महिनाभरासाठी कसा पुरणार अशी तक्रार या कष्टकरी नागरिकांनी सरनाईक यांच्याकडे केली होती. त्यावरून या नागरिकांना मिळणा-या शिध्यात वाढ करण्याची मागणी परिषा सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.