अक्षयकुमारनं पंतप्रधानांना तुम्ही आंबा कापून खाता की चोखून असा प्रश्न विचारला होता. ठाण्यात मात्र आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना भारतीय जनता पक्षाला लगावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी ठाकरे ठाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. ठाण्यातील आंबा विक्री केंद्रावरून झालेल्या वादाविषयी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. राज्यामध्ये शेतक-यांना स्टॉल लावून विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरात भाजीपाला विकून शेतक-यांना चार पैसे मिळणार असतील तर त्यांना त्यांचा व्यवसाय करू दिला पाहिजे. शेतक-यांचं भलं होत असेल तर यात पक्षीय राजकारण आणायला नको असं त्यांनी याप्रकरणी स्थानिक नेत्यांचं समर्थन केलं. याप्रकरणी १७ मे रोजी काढल्या जाणा-या मोर्चात आपण सहभागी होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांविषयी काही न बोलता राजीव गांधी आणि पुलवामा हल्ल्याचा विषय निवडणुकीत का काढतात असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मोदी म्हणजे काही देश नाही आणि त्यांनी आमच्या देशभक्तीची प्रमाणपत्रं देण्याची गरज नाही असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या करत असलेल्या काही वक्तव्यांमुळे ते चेष्ठेचा विषय झाले असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणावरूनही राज ठाकरे यांनी राज्य शासनावर टीका केली. राज्यातील २९ हजार गावांमध्ये दुष्काळ का पडतो, आत्तापर्यंत शासनानं काय कामं केली, खर्च केलेला पैसा कुठे गेला असे प्रश्न विचारत त्यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली.