ठाण्यातील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. आमदार संजय केळकर यांनी शहरातील नालेसफाईमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी हे आवाहन केलं. केळकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार समजले जातात. त्यांनी या भ्रष्ट्राचाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आणावे. आंब्याच्या एका स्टॉलसाठी मुख्यमंत्री हस्तक्षेप करत असतील तर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. नाल्यातून निर्माण झालेला पैसा कुठे जातो हे मुख्यमंत्र्यांनी शोधावे असं आवाहनही आव्हाड यांनी केलं. एकच अधिकारी गेले १० वर्ष महापालिकेच्या नालेसफाईवर लक्ष ठेवून आहे. नालेसफाईचं काम करणारे ठेकेदार कोणाच्या रोजंदारीवर आहेत आणि नालेसफाईवर गेली २५ वर्ष सत्तेत असलेले का बोलत नाहीत याचीही चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली.