कोरोना काळात जाणवणा-या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून गरजू लोकांना जीवदान मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. गेले दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि त्यामुळे राज्यभरात निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नवरात्रीच्या काळात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते. दुर्गाभक्तदान – महारक्तदान या संकल्पातून हा आरोग्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून या महोत्सवाची सुरूवात केली. जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा रक्तदान सप्ताह होणार आहे. ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय आणि स्टेट ब्लड ट्रान्स्फ्युजन कौन्सिल यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. महारक्तदान सप्ताहाच्या आयोजनात सहकार्य करणा-या जिल्हा रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानून हा रक्तदान महायज्ञ रक्तदात्यांच्या सहभागामुळे यशस्वी होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.