ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी होत असून ठाण्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत दिसणार असली तरी कमी मताधिक्याने का होईना पण शिवसेना हा मतदारसंघ कायम राखेल असं एकूण दिसत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच लढत झाली आहे. सुरूवातीला विचारे सहज निवडून येतील असं वाटत होतं मात्र आनंद परांजपे यांच्या नियोजनबध्द प्रचारामुळे त्यांनी शिवसेनेला जेरीस आणल्याचं पहायला मिळालं. राजन विचारे यांच्या एकूण स्वभावामुळे अनेकांच्या नाराजीचा फटका विचारे यांना बसण्याची शक्यता असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कमी मताधिक्याने का होईना पण विचारे यांना विजय मिळण्याची शक्यता आहे. परांजपे यांच्या प्रचाराचं नियोजन हे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळं परांजपे यांनी विचारे यांना अपेक्षेपेक्षा जास्त जोरदार लढत दिली. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ठाण्यात झालेल्या प्रचार सभेदरम्यान शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत मताधिक्यापेक्षा म्हणजे २ लाख ८१ हजार मतांपेक्षा अधिक मतांनी विचारे निवडून येतील असा दावा केला होता मात्र राजन विचारे आणि आनंद परांजपे या दोघांच्याही प्रचारातील डाव्या-उजव्या बाजू आणि राजकीय गरज पाहता राजन विचारे हे गेल्यावेळेपेक्षा कमी मतांनी निवडून येण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.