निवडणुकीआधी शिवसेना-भारतीय जनता पक्षानं ठाणेकरांना टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन पाळण्यात आलं नाही. त्यामुळं टोलमुक्तीसाठी आपण रस्त्यावर उतरणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या संवाद यात्रा सुरू असून त्यानिमित्त सुप्रिया सुळे ठाण्यात आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करून आघाडी सरकारच्या काळात केलेल्या लोकहिताच्या कामांची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेत आहोत. लोकांच्या मनात सध्या काय चाललं आहे याची माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या पक्ष बदलाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आज जी मोठी नावं पक्षांतर करत आहेत त्या नावांना मोठं कोणी केलं, पक्षामुळेच ही नावं मोठी झाली आहेत ना, ४० वर्ष पक्षासोबत असलेले लोक जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा दु:ख हे होणारच. पण जे लोक आता जात आहेत ते केवळ कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.