जुलै महिन्यात सुरू होत असलेल्या जैन समाजातील चातुर्मासाच्या अनुषंगाने जैन साधू-संतांना पायी विहार करण्याकरिता योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेसच्या सुमन अग्रवाल यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. चातुर्मासासाठी जैन साधू-साध्व्या आणि संत दरवर्षी पायी विहार करत चातुर्मास स्थळी पोहोचतात. त्यांचा पायी विहाराचा हा प्रवास चातुर्मासाच्या ठरलेल्या काळापासून किमान एक महिन्यापूर्वी सुरू होतो. या साधू-संतांमधील काहीजण व्हिल चेअरवर तर मोठे आचार्य चारचाकी गाड्यांसह असतात.
लॉकडाउनमुळे विविध गावांत-तालुक्यांमध्ये चातुर्मासासाठी पायी विहार करत असलेले अनेक साधू-संत अडकले आहेत. या साधू-संतांना पायी विहार करूनच चातुर्मासस्थळी पोहोचायचं असून हा प्रवास सुखरूप आणि सोप्यारीतीने पूर्ण होण्याकरिता सर्व पोलीस अधीक्षकांसह इतर संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती व्यवस्था करण्यासाठी आदेशित करावं अशी मागणी अग्रवाल यांनी या पत्रातून केली आहे. तसेच पादत्राणाविना सलग अनेक दिवस लांबच्या पल्ल्याचा पायी विहार करणाऱ्या या साधू-संतांकरिता ई-पासची अट ही कमी करावी असंही सुमन अग्रवाल यांनी म्हटलं आहे.