दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या धर्तीवर दुर्गम भागातील जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार निरंजन डावखरे आणि माजी आमदार रामनाथ मोते यांच्या प्रयत्नानंतर शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील यंदा प्रथमच दुष्काळ पडला आहे. मात्र या दुष्काळातून जव्हार आणि मोखाडा तालुक्याला वगळण्यात आलं होतं. ग्रामीण भागातील आदिवासी मुलांची शालेय पोषण आहारावर मोठी मदार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शाळांमध्ये सुट्टीच्या काळातही शालेय पोषण आहाराचं वाटप केलं जातं. मात्र जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील मुलं यापासून वंचित होती. या दोन्ही तालुक्यातील सर्वाधिक गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यांनाही शालेय पोषण आहार द्यावा अशी मागणी डावखरे आणि मोते यांनी केली होती. आमदार निरंजन डावखरे यांनी या आणि अशा विविध प्रश्नांसंदर्भात पालघरमध्ये बैठक घेतली होती. आमदार डावखरे यांनी याविषयी जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जव्हार आणि मोखाड्याचा समावेश झाल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर या तालुक्यातील मुलांना सुट्टीच्या काळात शालेय पोषण आहाराबरोबरच अन्य सवलती देणार असल्याचं सांगितलं. जव्हार-मोखाडा तालुक्याबरोबरच वसई तालुक्यातील ३५ गावांमधील मुलांनाही शालेय पोषण आहाराचा पुरवठा होणार आहे.