बारवी धरणातून घोडबंदर तसेच अन्य भागासाठी ५० दशलक्ष लिटर पाणी मिळावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. केळकर यांनी आज घोडबंदर येथील पाणी समस्येबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी केळकर यांनी ही मागणी केली. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेकडून २० दशलक्ष लिटर पाणी वागळे आणि कोपरी भागासाठी मंजूर केलं आहे. त्या अनुषंगाने घोडबंदर तसंच दिवा, विटावा या ठाण्याच्या अन्य भागासाठीही पाणी मिळण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली आहे. बारवी धरणाची उंची वाढवण्यात आली असून यासाठी महापालिकेनंही आपलं योगदान दिलं आहे त्यामुळे बारवी धरणातून अतिरिक्त पाणी मिळावं अशी केळकर यांची मागणी आहे. हे पाणी मिळण्यासाठी कोणत्याही आर्थिक तरतुदी अथवा जलवाहिन्या टाकण्याची आवश्यकता नाही. तर अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरीची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत खरंतर हा विषय का निघाला नाही ही बाब सुध्दा आपण महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणल्याचं केळकर यांनी सांगितलं. बारवी धरणातून ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पुरवठा झाल्यास घोडबंदर आणि अन्य भागातील पाण्याची समस्या निकालात निघू शकेल असं सांगून आपण यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.