देशात ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह अनेक समूहांना भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी प्रवासी भाड्यातील सवलत करोना काळापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना पूर्ण भाडे द्यावे लागत असून यात निवृत्त झालेल्या आणि वेतन नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आकडा अधिक आहे. त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शून्य प्रहरात रेल्वे प्रवाशांचा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसह ५३ विविध समूहाच्या प्रवाशांना प्रवासी भाड्यात सूट दिली जात होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी अशा विविध घटकांचा समावेश होता. यात महिला प्रवाशांना ५० टक्के तर पुरुष प्रवाशांना ४० टक्के तिकिटात सवलत दिली जात होती. मात्र २०२० वर्षात करोनाच्या संकटात ही सूट देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, खेळाडू विद्यार्थी आणि इतर विविध गटातील प्रवाशांना पूर्ण भाडे द्यावे लागते आहे. याबाबत सभागृहात बोलताना शिंदे यांनी एका माहिती अधिकाराचा दाखला दिला. गेल्या दोन वर्षात तब्बल चार कोटी ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण भाडे रेल्वे प्रवासासाठी दिले आहेत. ही सर्व संख्या निवृत्त आणि कोणतेही उत्पन्न नसलेल्या नागरिकांची आहे. सध्या फक्त १५ गटातील प्रवाशांना सवलत दिली जाते आहे. मात्र ही सवलत सर्व ५३ गटांना पूर्वीप्रमाणे देण्याची गरज आहे. देशात २०११ च्या जनगणनेनुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या ११ कोटी असून येत्या २०२६ पर्यंत ही संख्या १७ कोटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रवासात यापूर्वी दिली जाणारी प्रवासी भाड्यातील सवलत पुन्हा देण्याची आग्रही मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली.