कोविडमुळे सर्वात जास्त परिणाम शिक्षणावर झाला असला तरी कोरोनानेच आपल्याला तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ नेले. सर्वचजण इंटरनेट वापरू लागल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तेव्हा, आता तंत्रज्ञानाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या सस्कार या संस्थेमार्फत ‘संस्कार स्टडी क्लाऊड’ या अभिनव मोफत शैक्षणिक उपक्रमाचा श्रीगणेशा फडणवीस यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कोविडमुळे जनसामान्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्याच्या ऑनलाईन शिक्षणात खंड पडला. तेव्हा, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून आमदार संजय केळकर यांनी ‘संस्कार स्टडी क्लाऊड’ या शैक्षणिक उपक्रमाद्वारे पहिली ते बारावी पर्यंतच्या तब्बल १० हजार विद्यार्थ्यांना मोफत लाभ देण्यास प्रारंभ केला. या उपक्रमाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, कोविडमुळे सध्या शाळा बंद असल्या तरी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शाळा आणि शिक्षण आपल्यापर्यत पोहचु शकत असल्याने भविष्यात प्रगतीची संधी आहे. कोरानाने आपल्याला एक गोष्ट शिकवली, तंत्रज्ञानाच्या जवळ नेले. मोबाईल, इंटरनेट न वापरणारेही वापरू लागल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सध्या आपण जरी शाळेपर्यत पोहचु शकत नसलो तरी तंत्रज्ञानामुळे शाळा, शिक्षण आणि शिक्षक आपल्यापर्यत पोहचु शकत आहे. तेव्हा आता तंत्रज्ञानाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. असे मत व्यक्त करून फडणवीस यांनी, संजय केळकर यांनी राबवलेल्या स्टडी क्लाऊड या उपक्रमाचे कौतुक केले. राजकीय क्षेत्रात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण केले जाते. मात्र आमदार संजय केळकर हे ९५ टक्के समाजकारण आणि ५ टक्के राजकारण करतात अशी स्तुतीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.