कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून या पुलाची पाहणी करून देवेंद्र फडणवीस यांनी पुलाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. हा पूल आठ मार्गिकांचा होणार असल्याने वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरी पुलाचे काम आपले सरकार आल्यानंतर सुरू झाले. ठाणेकरांची मागणी लक्षात घेऊन हे काम आता पूर्ण होत आहे. याबाबत ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत, तरीसुद्धा यातील आणखीन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील आणि हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात निश्चितच लाभदायक ठरेल असं त्यांनी सांगितले. १९६५ साली उभारण्यात आलेला कोपरी पूल चार पदरी आणि पुर्वद्रुतगती महामार्ग आठपदरी असल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. राज्य सरकारने या पुलासाठी ९ कोटी मंजूर केले मात्र १० वर्ष फाईल धूळखात पडली. दरम्यानच्या काळात २०१३ साली आमदार संजय केळकर यांनी पाठपुरावा सुरु केला. मात्र पुलाच्या कामाचा खर्च वाढल्याने त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. फडणवीस यांनी तत्काळ मंजुरी देवून संबधित खात्यातून २९५ कोटी मंजूर करून दिले. केळकर यांनी एमएमआरडीए आयुक्त युपीएस मदान यांच्याकडे पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर नोव्हेंबर २०१८ मध्येदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोपरी पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. आता येत्या काही महिन्यात तो सुरू होईल.